कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.
अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.
याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.
साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.